Youtube

Youtube
Chanel

Saturday, 1 July 2023

krushi din 1jully

*वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी मौजे गहुली ता.पुसद* *जि.यवतमाळ या ठिकाणी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग (राठोड) नाईक यांनी हे गाव वसवले होते. चतुरसिंग हे तांडयाचे प्रमुख असल्या कारणाने लोक त्यांना नाईक म्हणत.*
*वसंतराव नाईक यांचे बालपण गहुली या गावी गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे सभोवतालच्या गावी, पोहरा देवी, उमरी, भोजला, बान्सी, या ठिकाणी झाले. जे की, आज पोहरा देवी हे जगातील बंजारा समाजाचे अराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. त्या काळी* *वाहनाची सोय नसल्यामुळे दररोज चार-पाच मैल चालत जावून येणे, मोठया जिद्दीने व कष्टाने त्यांनी शिक्षण घेतले. लहानपणापासून चाणाक्ष बुध्दी व वाक्पटुता यामुळे पुढील व्यक्तीवर चांगला प्रभाव पडत असे. नाईक साहेब यांना क्रिकेट या खेळाची खुप आवड होती. शिलबंद गळ्याचा कोट त्यांना खुप आवडत.*
*सन 1933 मध्ये नाईक साहेब यांनी निलसिटी विद्यालय, नागपूर येथून मॅट्रीक परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी मॉरीस कॉलेज नागपूर येथून बी.ए. पदवी पर्यंत शिक्षण घेवून 1937 मध्ये बी.ए. पदवी ही संपादन केली. त्यानंतर नागपूर शहराचा प्रभाव नाईक साहेबांच्या जीवनात फार महत्वाचा ठरला. तेथे त्यांच्यात अमुलाग्र बदल होत गेला.* *वाचनाची उदंड आवड असल्यामुळे महात्मा फुले व अन्य समाजसुधारकाचे वाचन त्यांनी केले. पुढे 1940 साली नागपूर विधी महाविद्यालयातून* *एल.एल.बी. ही पदवी संपादन केली. सन 1941 साली प्रख्यात वकील  कै.बॅरिस्टर पंजाबराव देशमुख यांच्या बरोबर व नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद येथे स्वतंत्र वकीली व्यवसाय सुरू केला. वकीली व्यवसायात त्यांनी दीनदुबळया, दलीत गोरगरीबांना मदतीचा हात देवून विविध अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले व त्यांना त्यात यश आले. डॉ.पंजाबराव देशमुख या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली एक धडाडीचा समाजकार्यकर्ता म्हणून वसंतराव नाईक साहेबांची ओळख संपूर्ण यवतमाळ जिल्हयात पसरली.*
*आंतरजातीय विवाह ः-*
महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांचा घाटे या ब्राम्हण समाजातील कुटूंबाबरोबर चांगले संबंध निर्माण झाल्यामुळे वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी कु.वत्सला घाटे या ब्राम्हण समाजातील मुलीबरोबर दि.6 जुलै 1941 रोजी नोंदणी पध्दतीने विवाह केला. आणि जीवनातील पहिली क्रांती वसंतरावांनी केली. त्याकाळी आंतरजातीय विवाह आणि नोंदणी पध्दतीने विवाह केला, यालाच क्रांती म्हणावी लागेल. बंजारा समाजातील असणार्या अनिष्ठ रूढी-परंपरा यात  बदल घडवून आणण्यासाठी वसंतरावांनी पुढाकार घेतला.
*राजकीय प्रवासः-*
वसंतरावजी नाईक साहेबांनी अल्पावधीत वकीली व्यवसायात प्रसिध्दी मिळाल्यामुळे बॅ.पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदनाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सन 1943 मध्ये तालुका काँग्रेस समितीचे ते अध्यक्ष झाले. 1946 मध्ये त्यांनी पुसद नगर पालिका निवडणूक लढविली. व त्यात विजयी होवून त्यांची पुसद नगरपालीकेचे नगराध्यक्ष म्हणून निवड झाली.

        सन 1946 ते 1952 हया काळात ते पुसद नगर पालीकेचे नगराध्यक्ष होते. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूका 1952 मध्ये पार पडल्या. 1952 मध्ये वसंतरावजी नाईक साहेब हे पुसद मतदार संघातून निवडणूून आले. पण हा मतदार संघ मध्यप्रदेशात येत असल्यामुळे त्यांना त्या राज्यात मंत्रीमंडळात महसुल खात्याचे उपमंत्रीपद दिले गेले. नंतर 1956 च्या राज्य पुनर्रचनेनंतर भाषावार प्रांतरचना नुसार मराठवाडा, विदर्भ व जुनी मुंबई (महाराष्ट्र) या राज्यात यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात सहकार कृषी व दुग्ध व्यवसाय या खात्याचे मंत्री झाले. 1957 साली दुसर्या पंचवार्षीक निवडणूकीत ते पुसद या मतदार संघातून दुसर्यांदा निवडणून आले. व मंत्रीमंडळात कृषिमंत्री म्हणून काम पाहिले.

    गोरगरीब, दीन-दलीत, दुबळया मुलांना उच्च शिक्षण मिळावे, आणि ते पुसद या ठिकाणी मिळावे, म्हणून 1960 मध्ये त्यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. दि.28 जुन 1961 रोजी जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित फुलसिंग नाईक कॉलेजची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळवून दिली. दि.1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची नवनिर्मिती झाली. व वसंतरावजी नाईक साहेब हे पहिले महसूल मंत्री बनले. या काळात कमाल जमीनधारणा संबंधी कायदा संमत केला. वर्षानुवर्षे जनीनदाराकडे हजारो हेक्टर जमीन पडून असल्याची खात्री केली. त्या जमीणीचे उत्पादन क्षमता वाढावी व शेतकर्यांना त्याचा अधिकार मिळावा. हा कायदा तयार करणारे आणि अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
*नाईक साहेब जिल्हा त्रिस्त्रीय योजना निर्मीतीचे शिल्पकार ः-*
वसंतरावजी नाईक समितीच्या शिफारशीवरून जिल्हयाचे कामकाज पाहण्यासाठी त्रिस्तरीय योजना अंमलात आली. जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हा परिषद, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती, आणि गावाच्या ठिकाणी ग्रामपंचायत, ग्रामीण भागातील लोकांना वाव मिळावा, लोक सरकारच्या कारभारात सामील व्हावेत, हा उद्देश ठेवून नाईक साहेबांनी जिल्हा परिषदेमध्ये लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारा प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हा लोकांमधून निवडून येणारा सदस्य असावा. तसेच तालुकास्तरावर तालुक्याच्या अडचणी समजून घेणारा पंचायत समिती सभापती हा लोकांमधून निवडणून आलेला सदस्य असावा. तसेच गावपातळीवर गावाचा कारभार पाहण्यासाठी सरपंच हा लोकांमधुन निवडणून येणारा सदस्य असावा, म्हणजे जिल्हा, तालुका, आणि गावस्तरावरील अडीअडचणी सोडवून गावांचा विकास साधता येईल. अशी नाईक साहेबांनी शिफारस केली आणि केंद्राने सुध्दा सदर शिफारस स्विकारली. व इतर राज्यात लागू केले.
सन 1962 मध्ये तिसर्या पंचवार्षीक निवडनुकीमध्ये वसंतरावजी नाईक साहेब विधान सभेवर निवडून गेले. याच काळात चीन आणि भारत युध्द चालू असल्यामुळे केंद्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात संरक्षणमंत्री पदी पाचारण करण्यात आले. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री कोण

      अशी चर्चा कॉग्रेस पक्षश्रेष्ठीत सुरू झाल्यानंतर ज्येष्ठतेनुसार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून दादासाहेब कन्नमवार यांची निवड करण्यात आली. दुदैर्वाने कन्नवार यांचे एक वर्षाच्या आत दुख:द निधन झाले. पुन्हा एकदा मुख्यमंत्री निवडीसाठी चर्चेला उधाण आले. पक्षश्रेष्ठीच्या निवडीनुसार सर्वानुमते वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव समोर आले.
महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून दि.5 डिसेंबर 1963 रोजी वसंतरावजी नाईक साहेबांनी मुख्यमंत्री पदाची पहिली शपथ घेतली. महाराष्ट्राची धुरा संभाळत असतांना तेव्हाचा काळ अडचणीचा होता. 1) भारतावर दोनवेळा आलेला युध्दाचे संकट (चीन आणि पाकिस्तान) 2) कोयनेचा भुकंप (11 डिसेंबर 1966) त्यानंतर 1972 अशी संकटाची मालीका झेलत असतांना वसंतरावजी नाईक साहेबांनी संकटाना आव्हान समजून प्रगतीच्या वाटेवर नेली. दुष्काळाच्या काळात जनता अन्नास मोताल झाली होती. आणि सगळीकडे अन्नावाचून भूकबळीचे प्रमाण वाढत होते. वसंतरावांनी महाराष्ट्र अन्नधान्न स्वयंपूर्ण करण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतली. पुण्याच्या शनीवार वाडयासमोर दि.3 ऑक्टोबर 1965 रोजी भल्यामोठया सभेत त्यांनी घोषणा केेली.ङ्ग येत्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर जाहीरपणे फाशी घेईल . ङ्घ त्यांच्या या घोषनेनंतर टीका टिपण्णी झाली. मात्र यामधून प्रशासन आणि शेतकर्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी भरघोेेष उत्पादन देणार्या हायब्रिड ज्वारीच्या वाणाला त्यांनी प्रोत्साहन दिले.
या संकरीत वाणाचा प्रयोग त्यांनी स्वत: सेलु येथील शेतीत केला. शुभ्रदाण्यानी लगडलेली हातभर लांबीची कणसे पाहून शेतकर्यांची डोळे भारावून आले. एखाद्या झपाटलेल्या शास्त्रज्ञाप्रमाणे वसंतराव शेतकर्याच्या बांधावर पोहोचले.मुख्यमंत्राच्या गाडयांचा ताफा रस्त्यात थांबवून रस्तेलगतच्या शेतात संक्रीत ज्वारीच्या वाणाचा प्रचार आणि प्रसार केला. भरघोेष पीक काढणार्या शेतकर्याच्या पाठीवरून शाबासकीची  थाप टाकत असत. पाण्याच्या बाबतीत ते नेहमी म्हणत, तुम्ही शेतीला काहीही करून पाणी द्या, ती भिजवा, धरणाच्या पाण्याने, विहिरीने, नाल्याचे पाणी द्या, ओंजळीने पाणी द्या. हेही होत नसेल तर घाम गाळून का होईना शेती भिजवा. नाईक साहेब हमेशा शेतकर्यांना स्फूर्ती व प्रेरणा देत असत.
मराठी भाषेला राजभाषचा दर्जा- महाराष्ट शासनाची राजभाषा मराठी असल्याची घोषणा वसंतरावजी नाईक साहेबांनी 1 मे 1966 साली केली.
सन 1967 साली चौथ्या पंचवार्षीक निवडणूकीत पुसद तालुक्यातून चौथ्यार्यांदा वसंतराव नाईक साहेब विधानसभेवर निवडणून गेले. मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीत चांगले काम केल्यामुळे कॉग्रेस पक्षाच्या वतीने 202 आमदार निवडून आणले. व 1972 च्या निवडणूकीत 222 आमदार निवडून आले.  ही किमया आजपर्यंतच्या एकाही पक्षाला साधता आली नाही, ती वसंतरावजी नाईक साहेबांनी करून दाखविली.
  दि.6 मार्च 1967 ला दुसर्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर साहेबांनी शेतकर्यांसाठी खुप मोठे कार्य केले. 1) शेतकर्यांच्या समस्या, शेतीच्या येणार्या अडचणी महाराष्ट्राचे हवामानानुसार मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागातील शेतकर्यांना समान न्याय, वेळेवर तिन्ही हंगामात मार्गदर्शन मिळावे, तसेच संशोधन होवून नवनवीन प्रयोग व्हावे  

        *यासाठी चारही विभागात चार कृषि विद्यापीठे मुख्यमंत्री असतांना दिले व उल्लेखनीय कार्य केले.*

1) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी- सन 1969.
2) डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, सन 1971.
3) डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली- सन 1972.
4) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी- 1972. समान न्याय देणारे कृषि विद्यापीठ देवून वसंतरावजी नाईक साहेब शेतकर्यांचे दैवत झाले. आज या विद्यापीठातून हजारो विद्यार्थी शेतीविषयक शिक्षण घेवून प्रशासनात, शेती, व्यवसायात प्रगती केलेली आहे, ही नाईक साहेबांची देण आहे.
5) एकाच वेळेस पन्नास लाख लोकांना रोजगार हमी योजनेत काम देवून योजना राज्यात राबविली. सदर योजना केंद्रात महात्मा गांधी रोजगार हमी योजना नावाने चालू आहे.
6) कोरडवाहू शेतीला सिंचनाची जोड म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा या मूलमंत्राचा पुरस्कार करून शेतात बांध टाकून पाणी अडवले व शेतीपुरक उद्योगाला चालना दिली.1) कुकूटपालन, पशूपालन, दुग्धउत्पादन या सारख्या प्रयोगाचे धडे स्वत:च्या सेलु येथील शेतीमधून दिले.
7) गोरगरीबांच्या मुलांसाठी जिल्हानिहाय आश्रमशाळा काढून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
सन 1972 च्या पंचवार्षीक निवडणूकीत पाचव्यांदा विधानसभेवर निवडून गेले व दि.14 मार्च 1972 रोजी तिसर्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या काळात शेतकर्यांची होणारी दलालापासून होणारी पिळवणूक थांबण्यासाठी सन 1972 ला कापूस एकाधिकार योजना अंमलात आणली. 1977 मध्ये वाशिम लोकसभा मदतार संघातुन लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. तसेच बिहारचे राज्यपाल पद पण त्यांनी नाकारले, कारण त्यांना महाराष्ट्राची सेवा करायची होती.  
महाराष्ट्र अंधारमुक्त करण्यासाठी औष्णिक प्रकल्प- कोरडी, खापरखेडा, तसेच पारस आणि परळी वीज केंद्राची सुरूवात नाईक साहेबांच्या काळात झाली. तसेच उजनी धरण, जायकवाडी धरण, आरुणावती, अप्पर वर्धा, या धरणाची कामे नाईक साहेबांच्या काळात झाली.
अशा महामानवाचा दि.18 ऑगस्ट 1979 साली वयाच्या 66 व्या वर्षी सिंगापूर येथे काळाने झडप घातली. एका वादळाच्या वंशाजाचा शेवट झाला. 20 ऑगस्ट 1979 रोजी गहुली या गावी अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.   आशा   महान  कार्य करणाऱ्या   मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांना  110 व्या जयंती  कोटी- कोटी विनम्र अभिवादन .💐💐🌹🌹🙏🙏🙏*

        *नितीन नाईक*
        सहायक कृषि अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025