*विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम! -*
मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये पुढील 8 जिल्हे आणि त्यातील – 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत.
*1)औरंगाबाद 2)नांदेड 3)परभणी 4)बीड 5)जालना 6)लातूर 7)उस्मानाबाद व 8) हिंगोली*
दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. *जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प* मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.
यामध्ये *वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी* अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.
*मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी –*
पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, *गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे* या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.
मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे *काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्गजी जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच सूर्यभान पवार* आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.
या मुक्ती संग्रामात *श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील* आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा नं बाळगता काम केले.
या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.
निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाली – ती *सरदार वल्लभभाई पटेल* यांच्यामूळे. ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.
मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद काबिज केले.
15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.
हैदराबादचे सेनाप्रमुख *जनरल अल इद्गीस* यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि *खुद्द निजाम शरण आला*.
हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला…!
हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला…!
हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला…!
*१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाऊ लागला.*
*🌹मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹*
No comments:
Post a Comment