Youtube

Youtube
Chanel

Monday, 1 July 2019

Haritakrantiche janak vasantaraoji naik

आज १ जुलै, महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. नाईक यांनी त्यांचे उभे आयुष्य कृषीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी खर्ची केले. शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे. हा त्यांचा ध्यास होता आणि त्याच्या पूर्ततेकरिता ते अहोरात्र राबत होते. राष्ट्रीय पातळीवरील कृषी मंत्र्यांच्या व मुख्यमंत्र्याच्या परिषदांमध्ये तर त्यांचे विचार किती प्रभावी असायचे. याबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे म्हणतात की, केंद्र सरकारच्या अन्न व शेती मंत्रालयाच्या वतीने भारतीय पातळीवर वर्षातून एक-दोन वेळा कधीकधी तीनचार वेळाही मुख्यमंत्र्यांच्या परिषदा होत असत. संपूर्ण देशातील बहुतेक सर्व मुख्यमंत्री या परिषदांना हजर असायचे. अशा परिषदेत इतर मुख्यमंत्री प्रामुख्याने स्वतःच्या प्रांतातील प्रश्न मांडत असत. वसंतराव महाराष्ट्राचे प्रश्न प्रभावीपणे मांडीतच परंतु राष्ट्रीय प्रश्नावरही त्यांचा भर असे. नाईक १९६३ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हा काळ देशातील शेतीच्या आघाडीवरील अरिष्टांचा काळ होता. भारताचा अमेरिकेबरोबर सवलतीच्या अटीवर अन्नधान्य घेण्याचा पी.एल.-480 हा करार झालेला होता. अन्नधान्याचा देशात एवढा तुटवडा होता की बर्याच वेळा अन्नधान्य बोटीतून उतरवून घेतल्याबरोबर सरळ रेशन दुकानात पाठवावे लागत होते. परदेशातून आयात केलेल्या धान्यापैकी 30 ते 35 टक्के धान्य केंद्र सरकारला महाराष्ट्राला द्यावे लागत होते. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने नामुष्कीची बाब होती. याची वसंतरावांना जाणीव होती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापासूनच देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले पाहिजे, असे ठराव निरनिराळ्या पातळीवर केले जात. तथापि भारतातील अन्न प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने विशेष प्रगती होऊ शकली नव्हती. नाईकांनी अन्नधान्याचे आव्हान स्वीकारले आणि राज्यभर तुफानी दौरे करुन शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करुन संकरित बियाणांचाच जास्तीत जास्त पेरा करुन राज्याला व पर्यायाने देशाला अन्नधान्याच्या गंभीर संकटातून बाहेर काढण्याचे कळकळीचे आवाहन केले. संकरीत बियाणांचा वापर करायचे शेतकऱ्यांना केवळ आवाहनच त्यांनी केले नाही. तर त्यांच्या स्वतःच्या गहुली व शेलू येथील शेतीत संकीरत बियाणांची मोठय़ा प्रमाणावर लागवड त्यांनी केली. त्यांच्या या धाडसी धोरणामुळे संकरित बियाणांचा प्रचार तडकाफडकी झाला आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील चित्र बदलले. सुरुवातीला शंभर एकर जमीन संकरित बियाणांच्या लागवडीखाली होती, ती ५०,००० एकरांच्या पुढे गेली व हे प्रमाण सतत वाढत होते. नाईकांच्या प्रयत्नांना मोठय़ा प्रमाणात यश येत होते. याच वेळी अमेरिकेने पीएल 480 करारांतर्गत कुरापती काढून अन्नधान्याचे जहाज रोखून धरल्याबरोबर नाईकांचा प्रखर राष्ट्रीय बाणा जागृत झाला आणि ते पुण्याच्या शनिवार वाडय़ासमोर गरजले, ‘महाराष्ट्र जर येत्या दोन वर्षात अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या.’ त्यांचे हे आवाहन स्वीकारुन सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली. या यंत्रणेतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी चोखपणे बजावली व महाराष्ट्र आणि पुढे देशसुध्दा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. विदेशातील निकृष्ट दर्जाच्या धान्याची आयात करणे बंद झाले. जो देश अन्नधान्याच्या बाबतीत सर्वस्वी परावलंबी बनला होता तो स्वावलंबी झाला ही परिस्थिती त्यांच्या हयातीतच आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांनाच निर्माण झाली. हे विशेष महत्त्वाचे आहे. म्हणूनच बांगलादेशाच्या युध्दाच्या वेळेस म्हणजे १९७१-७२ साली बांगलादेशाच्या लक्षावधी निर्वासितांना भारत सरकार अन्न पुरवू शकले. बलाढय़ शक्ती असलेल्या रशियाला अथवा चीनलासुध्दा त्या काळात जे शक्य झाले नाही ते भारताने करून दाखविले. त्यामुळे भारत सर्वत्र कौतुकाचा विषय बनला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जागतिक अन्न व शेती संघटनेच्यावतीने व डॉ. बोरलॉग यांच्या मेक्सिकोतील आंतरराष्ट्रीय गहू व मक्याच्या संशोधन केंद्रातर्फे आणि अनेक राष्ट्राच्या वतीने जाहीर गौरव केला गेला. या गौरवात नाईकांचा मोठा वाटा होता. १९७२ च्या दुष्काळाचा सामना करतांना नाईकांनी जे परिश्रम घेतले. त्याला तोड नाही. या दुष्काळामधूनच क्रांतकारी अशा रोजगार हमी योजनेने महाराष्ट्रात आकार घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय नाईकांनाच जाते. त्यातही रोजगाराची हमी देणारी एवढी मोठी आणि क्रांतीकारी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशपातळीवरचे पहिले राज्य होते. आज तर महाराष्ट्राची ही योजना केंद्र सरकारने जशीच्या तशी राष्ट्रीय स्तरावर नरेगा च्या नावाने सुरु केली आहे. यामागे महाराष्ट्राचे व ही योजना सुरु करणाऱ्या ह्या महान नेत्यांचे कर्तृत्व आहे. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीत असतानाही एवढी मोठी कोटय़ावधी रुपयांची योजना कशी सुरू करायची असा प्रश्न पडला असतानाही तत्कालीन विरोधीपक्ष नेते कृष्णराव धुळुप आणि इतर सर्व विरोधीपक्ष सदस्यांनी सरकारला करवाढ करायचे सुचवून जगातील संसदीय लोकशाहीच्या इतिहासात एका नवीन घटनेची नोंद झाली. नाईकांनी महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत. या प्रयत्नातूनच महाराष्ट्रातील ज्वारी खरेदी योजना, कापूस एकाधिकार योजना, वसंत बाध बंधाऱ्यांची निर्मिती, तब्बल चार कृषी विद्यापीठाची निर्मिती, अनेक सहकारी सुतगिरण्या आणि सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती, सहकारी दुग्ध विकास संघाची निर्मिती, या सारख्या कृषी क्षेत्राशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्यात. नाईकांचे शेती आणि शेतकऱ्यांवर निस्सीम प्रेम होते. ते त्यांनी स्वतः पुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांना त्यांनी आग्रहाने शेती घ्यायला लावली. नाईकांनी शेती व शेतकर्यांवर जसे प्रेम केले तसेच पक्षातील व विरोधी पक्षातील नेत्यांचाही सदैव आदर केला. आज नाईकांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ह्या महानायकास विनम्र अभिवादन. #VasantraoNaik #वसंतरावनाईक #हरितक्रांती #कृषीदिन #शेतकरी #AgricultureDay deepakdambalekwt@gmail.com

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025